धाराशिव (वृत्तसंस्था) तालुक्यातील शेलगाव (ज.) शिवारात शेतकरी तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. संतोष भुजंग तवले (वय ४०), असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शेलगाव (ज.) येथील संतोष भुजंग तवले (४०) यांची शेती गावच्या शिवारात एरंडगाव रस्त्यावर आहे. तवले बुधवारी (दि.१९) रात्री शेतातील गोठ्यात झोपायला गेले होते. मध्यरात्री किंवा गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात लोकांनी तवले यांचा झोपलेल्या ठिकाणीच धारदार शस्त्राने गळा चिरून खून करून पलायन केले. सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर पोलीस पाटील अवताडे यांनी येरमाळा पोलीस ठाण्यास माहिती दिली.
सहायक पोलीस निरीक्षक अतुल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सहाय्यक पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनीही शेलगावला भेट देत तपासाच्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. धाराशिव येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनेचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.
या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले. यानंतर मयताचा भाऊ संदीप तवले यांनी येरमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून रवींद्र लिंबराज तवले याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेतीच्या वादातून खून केल्याचे रवींद्र तवले यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि अतुल पाटील करीत आहेत. याघटनेने गावासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबतचे वृत्त आज स्थानिक माध्यमांनी दिले आहे.