यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात हरभरा पिकाची कापणी करून एका ठिकाणी त्याला गोळा करित ढीग करून ठेवण्यात आले होते. दरम्यान एका ठिकाणी गोळा करून ठेवलेल्या या हरभऱ्याला कोणीतरी अज्ञात माथेफिरूने आग लावली. ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. असून यात शेतकऱ्यांचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. याच शेतकऱ्याचे गेल्या वर्षी देखील याच शेतातील मका पीक देखील अज्ञाताने जाळून टाकले होते. व आता हरभरा पिक जाळून टाकल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किनगाव बुद्रुक ता. यावल या गावातील रहिवासी मुरली कोळी यांनी आपल्या शेतात पाच एकर क्षेत्रावर हरभरा पिक लागवड केली होती. हरभरा पिक आता कापणी योग्य झाल्यानंतर त्यांनी सदर हरभरा कापून शेतात एका ठिकाणी ढीग करून ठेवला होता. तेव्हा शनिवारी रात्री कोणीतरी अज्ञात माथेफिरूने ढीग करून ठेवण्यात आलेला कोरडा हरभऱ्याला आग लावून दिली. हा प्रकार निर्दशनास येताच शेतकऱ्यांनी शेतात धाव घेतली. बघता बघता डोळ्यासमोरच संपूर्ण मेहनतीने उत्पन्न काढलेला हरभरा, उत्पादित झालेला हरभरा हा डोळ्यासमोरच पूर्णपणे पेटून खाक झाला. यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी, पोलीस नाइक किशोर परदेशी करीत आहे.