धाराशिव (वृत्तसंस्था) विवाहानंतर श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जात असताना नवदाम्पत्याच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात नवरदेवाचे वडील आणि आत्याची मुलगी असे दोघेजण जागीच ठार झाले, तर अन्य १४ जण जखमी झाले आहेत.
बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील लंजवड येथील चव्हाण कुटुंबातील मुलाचा ४ मे रोजी विवाह सोहळा पार पडला होता. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंबीय श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जीपमधून (केए १७ सी १२१३) औसा मार्गे तुळजापूरकडे येत होते. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तुळजापूर-औसा महामार्गावरील करजखेडा शिवारात गाडीचे अचानक टायर फुटले. त्यामुळे भरधाव जीप पलटी होत झालेल्या अपघातात नवरदेवाचे वडील विष्णू नारायण चव्हाण (वय ६०, रा. लंजवड) व आत्याची मुलगी मंदाकिनी दत्ता परिहर (३२, रा. पुणे) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात शिवनंदा जनार्दन चव्हाण, पुष्पा अर्जुनराव सोरेकर, अंजली सुनील पवार, अरुणा सुनील दहे, अक्षरा सुनील पवार, प्रद्युम्न विष्णू चव्हाण, सुनील लक्ष्मण दहे, सोनाली बळीराम चव्हाण, अभिषेक शेषेराव चव्हाण, श्रेयश श्रीपाद परिहर, सुनीता विनोद चव्हाण, सुमित शिवाजी चव्हाण, साहिल सुनील दहे, श्रेया सुनील दहे हे जखमी झाले. दरम्यान, मृत विष्णू चव्हाण यांचा मुलगा प्रद्युम्न चव्हाण याचा अंजलीशी दोन दिवसांपूर्वीच म्हणजे ४ मे रोजी विवाह झाला होता. नवदाम्पत्यासोबत चव्हाण कुटुंबीय नातेवाइकांसह श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत होते. त्याचवेळी काळाने घात केला.