धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रोटवद गावाजवळ आज दुपारी एका कारला झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर अन्य चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे.
यासंदर्भात अधिक असे की आज दुपारी साधारण अडीच वाजेच्या सुमारास शेंदुर्णी येथील पाच तरुण टाटा मांजा या कारमधून धरणगावकडून चोपडा येथे एका लग्न समारंभात जात होते.
रोटवद गावाजवळ कार चालवणाऱ्या चालकाचा अनेक अचानक वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्यालगतच्या पाठचारीतून थेट इलेक्ट्रिक पोलला धडकली. कारने दोन ते तीन वेळेस पलटी मारली. यामुळे चालक भैय्या मधुकर बारी (रा. शेंदुर्णी ता. जामनेर) हा तरुण जागीच ठार झाल्याची माहिती पोलीस पाटील नरेंद्र शिंदे यांनी दिली. तर कारमधील अनिल विठ्ठल बारी (वय-२४), प्रसाद रामदास गुरव (वय-१९), मोना सुनील चौधरी (वय-१८), सुभाष रामलाल भगत (वय-१९) सर्व रा. शेंदुर्णी ता. जामनेर चौघे गंभीर जखमी झाले आहे. त्यातील एकाची प्रकृती अतिगंभीर असल्याचे देखील श्री. शिंदे यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी सपोनि गणेश आहिरे, पोहेका ईश्वर शिंदे, वैभव बाविस्कर, प्रदीप पाटील, गजेंद्र पाटील, श्री. सूर्यवंशी यांना घटनास्थळी रवाना केले. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जखमींना जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले होते. तर धरणगाव पोलिसात अद्याप या अपघाताबाबत कुठलीही नोंद नव्हती.