जळगाव (प्रतिनिधी) मुलीला तहसीलदार बनविण्याचे अमिष दाखवित कल्पना आत्माराम कोळी (वय ५३, रा. नेहरुनगर, मोहाडी रोड) यांच्याकडून ज्योती अशोक साळुंखे (रा. मणियार वाडा, बालाजी मंदिराजवळ) या महिलेने ४ लाख २२ हजार रुपये रोख, ३ लाख रुपयांचे ११० ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने आणि विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरुन जमा झालेले ३ लाख ५१ हजार ९५० रुपयो असे एकूण १० लाख ७५ हजार ९५० रुपये घेवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मोहाडी रोड परिसरात कल्पना आत्माराम कोळी यांची मुलगी वैशाली कोळी या खंडेराव नगरात वास्तव्यास आहे. हळदी कुंकुच्या कार्यक्रमामध्ये त्यांची ज्योती अशोक साळुंखे या महिलेशी ओळख झाली होती. त्या महिलेने कल्पना कोळी यांना माझी शासकीय कार्यालयात खूप ओळख असून तुमच्या मुलगा किंवा मुलीला शासकीय नोकरीला लावून देवू शकते असे सांगतले. त्याकरीता त्या महिलेने तिच्या मोबाईलवरुन काही लोकांची बोलणे करुन दिले होते. नोकरीला लावण्यासाठी आपल्याला काही पैसे द्यावे लागतील असे देखील त्या महिलेने सांगितले होते. तहसीलदार बनविण्यासाठी ज्योती साळुंखे ही कल्पना कोळी यांना भेटून त्यांना आपल्याला २५ ते ३० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला ३० हजार रुपये घेतले होते होते. अजून थोडे पैसे लागतील असे म्हणत ज्योती साळुंखे हीने कल्पना कोळी यांच्याकडून दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी पासून ते दि. ५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ४ लाख २२ हजार रुपये उकळले होते.
मुलीला तहसीदार बघायचे ना म्हणत ११० ग्रॅम दागिने घेतले
ज्योती साळुंखे हीने कल्पना कोळी यांच्याकडून पैसे उकळल्यानंतर तीने अजून पैशांची मागणी केली. तसेच पैसे नसतील तर सोन्याचे दागिने द्या ते पुन्हा बनवता येतील, तुम्हाला वैशालीला तहसीलदार झालेले पहायचे आहे की नाही असे सांगितल्यानंतर कोळी यांनी त्यांच्याकडे असलेली एक चार तोळे दुसरी ३ तोळे सोन्याची पोत, पाच ग्रॅमच्या साळख्या, १ तोळ्याच्या दोन अंगठ्या, १६ ग्रॅमचे टोंगल, २ ग्रॅमची चीप, ७ ग्रॅमची पोत असे एकूण ११० ग्रॅम सोन्याचे दागिने ज्योती साळुंखेला दिले.
पैसे, दागिने परत मागितले असता दिली धमकी
अनेक दिवस झाले तरी नोकरीबद्दल काहीच होत नसल्याने कल्पना कोळी या ज्योती साळुंखे हीच्या घरी गेल्या. त्यावेळी तीला पैसे आणि सोन्याचे दागिने परत करण्याबाबत विचारणा केली असता, तीने तुमचा एक रुपयाही देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा तुमचे हातपाय तोडून तुम्हाला संपवयाला सुद्धा कमी करणार नाही अशी धमकी दिली. त्यानुसार कल्पना कोळी यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार ज्योतील अशोक साळुंखे रा. मणियार वाडा, बालाजी मंदिराजवळ हीच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों जितेंद्र तावडे करीत आहे.
५६० महिलांनी भरलेल्या फॉर्मचे पैसेही घेतले
काही दिवसांनी कल्पना कोळी यांनी ज्योती साळुंखे हीला नोकरीबद्दल विचारणा केली. यावर तीने निवडणुकीचा काळ चालू असून थोडे दिवस वाट बघावी लागेल. मी वैशालीला सरकारी योजनांमधून पैसे कमावून देते असे म्हणत शासकीय योजनांच्या नावाखाली ५६० महिलांचे फॉर्म भरुन त्यांच्याकडून घेतलेले ३ लाख ५१ हजार ९५० रुपये आणि वैशाली कोळी हीची ६ तोळे वजनाची पोत देखील ज्योती साळुंखे ही घेवून गेली.
















