
नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) – अभिषेक शर्माच्या तडाखेबंद ३० चेंडूंतील विक्रमी शतकाच्या बळावर भारतीय संघाने टी-२० मालिकेतील अंतिम व तिसऱ्या लढतीत अफगाणिस्तानचा १२७धावांनी धुव्वा उडवला. अभिषेकने ३४ चेंडूंत ९ चौकार आणि ११ उत्तुंग षटकारांनी १०८ धावांची खेळी उभारत भारताला ७बाद २२१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा डाव १४.१ षटकांमध्ये ९४ धावांत आटोपला. भारतीय संघाने या बळावर ३-० असे निर्भेळ यश साधत आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी जोरदार तयारी केली.
अभिषेक शर्मा-संजू सॅमसन या सलामीच्या जोडीने अखेरच्या लढतीमध्येही सातत्य राखत अफगाणच्या गोलंदाजीवर चौफेर हल्ला चढवला.
अभिषेक-सॅमसन या दुकलीने पॉवर प्लेमध्ये १०० धावांची लयलूट करीत आपले मनसुबे दाखवून दिले. यामध्ये सर्वाधिक वाटा होता अभिषेकचा, कारण त्याने १६ चेंडूंत अर्धशतकाची नोंद करत भारताच्या द्विशतकी धावसंख्येचा पाया रचला. अभिषेक ३० चेंडूंत शतक झळकावल्यानंतर बाद झाला. पण, त्याने सॅमसनसोबत ५९ चेंडूंत १४२ धावांची खणखणीत भागीदारी रचली. सॅमसननेही संधी सत्कारणी लावत ३५ चेंडूंत २ चौकार, ४ षटकारांनी सलग दुसरे अर्धशतक झळकावताना ५० धावा काढल्या. अभिषेक आणि सॅमसन बाद झाल्यानंतर उर्वरित फलंदाज धावगती कायम राखू शकले नाही, पण कर्णधार श्रेयस अय्यर (२९), शिवम दुबे (१४) आणि इशान किशनने (१०) धावसंख्या दोनशेच्या पार पोहचवली. विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाण संघाकडून एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
















