जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विटनेर ते पळासखेडा दरम्यान दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. साहिल विष्णू आराख (वय २४ रा. खुवचंद साहित्या अपार्टमेंट) असे मयत झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, साहिल आराख हा आज मंगळवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी समतानगरातील चुलत भाऊ संदेश आराख याच्या सोबत दुचाकी क्रमांक (एम.एच २८५७५३) ने सोयगाव येथे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात होते. यादरम्यान पळासखेडा मिराचेजवळ शिवढावा या हॉटेलसमोर दुचाकीस्वार साहिल याचे दुचाकीवरुन नियंत्रण सुटले. यात गाडी पूलाखाली कोसळण्यापूर्वी दुचाकीस्वार साहिल व मागे वसलेला संदेश या दोघांनी दुचाकीवरुन उडी मारली. गाडी पूलाखाली कोसळली तर उडी मारल्यानंतर रस्त्यावरील दगडावर डोके आपटल्याने गंभीर दुखापत होवून साहिल जागीच ठार झाला तर संदेश जखमी झाला आहे. साहिल यास जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. यानंतर दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.