चाळीसगाव (प्रतिनिधी) आज पहाटे कन्नड घाटात तीन ट्रक एकमेकांवर आदळल्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. दरम्यान, दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक महामार्ग पोलिसांनी काहीअंशी वाहतूक सुरळीत केली होती.
शुक्रवारी पहाटे घाटातील महादेव मंदिराजवळ तीन ट्रक एकमेकांवर आदळल्यामुळे घाटात दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अपघाताचे वृत्त कळताच राष्ट्रीय महामार्ग चाळीसगाव केंद्राचे अधिकारी भागवत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली पाटील, पोहेकाॕ चंद्रकांत पाटील, पोलिस नाईक नरेश सोनवणे, सोपान पाटील, शैलेश महाजन, नितिन ठाकुर, दिनेश चव्हाण, रमेश पाटील, जितेंद्र माळी यांनी अपघातस्थळी धाव घेतली. यानंतर अपघातग्रस्त वाहने हटविण्याचे काम सुरु केले. सकाळी साडेअकराच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त तिघं ट्रक हटविण्यात आले. यानंतर चाळीसगाव व औरंगाबाद या दोन्ही बाजुंनी थांबून असलेली वाहने सोडण्यात आली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा बऱ्यापैकी वाहतूक वाहतूक सुरळीत करण्यात महामार्ग पोलिसांना यश मिळाले होते.