चाळीसगाव (प्रतिनिधी) अक्कलकोट येथून स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारचा तालुक्यातील कन्नड घाटात रविवारी २६ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तवेरा गाडी दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान, मध्यरात्री अपघाताची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांच्या टीमसह महामार्ग, ग्रामीण व शहर पोलिसांसोबतच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाग्रास्तांना खोल दरीतून वर काढले.
चालकाचे नियंत्रण सुटले अन घडलं भयंकर !
पावसामुळे औट्रम घाटात सकाळपासून धुक्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच गाडीचा चालक अभय पोपटराव जैन (वय ५०) हा काचेवर धुक्यामुळे आलेली वाफ कापडाने पुसत असतांनाच त्याचे गाडीवर नियंत्रण सुटले. अंधार आणि धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अक्कलकोट येथून दर्शन घेऊन परत येत असलेली (एमएच १९, ४९१६) क्रमांकाची तवेरा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कारने घाटाचे कठडे तोडून थेट दरीत कोसळली. वाहन चालकाने वाहनाचा वेग कमी न करता काचेवरील दव पुसण्याचा प्रयत्न करित असतांना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू !
या अपघातात कारमधील प्रकाश गुलाबराव शिर्के (वय ६५), शिलाबाई प्रकाश शिर्के, (वय ६०), वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय ३५) यांच्यासह पूर्वा गणेश देशमुख (वय ८) या बालिकेचा दुर्देवी मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले सात जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात कार शेकडो फुटांवरुन खाली कोसळल्यामुळे कारचा चक्काचूर झाला. काही तासानंतर पोलिसांनी अपघातात मयत झालेल्यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान चौघेही एकाच कुटुंबातील असल्याचे कळते.
पोलिसांनी केली भरपावसातच बचाव कार्याला सुरुवात !
रात्रीच भरपावसात बचाव कार्याला सुरुवात केली. मात्र संततधार सुरु असलेल्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता. पोलिसांनी बचाव कार्य करीत दरीत कोसळलेल्या मृतांसह जखमींना बाहेर काढले. अपघातातील अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०), जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०), सिद्धश पुरुषोत्तम पवार, (वय १२), कृष्णा वासुदेव शिर्के (वय ४), रूपाली गणेश देशमुख (वय ३०), पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय ३५), वाहन चालक अभय पोपटराव जैन (वय ५०) जखमींना तात्काळ उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
यांनी केली बचावकार्यात मदत !
पोलीस निरीक्षक संदीप पाटील, महामार्ग API रुपाली पाटील, psi योगेश माळी, Asi राजेंद्र साळुंखे, phc संदीप पाटील, शंकर जंजाळे, नंदु परदेशी, युवराज नाईक, भुपेश वंजारी, विजय शिंदे, ज्ञानेश्वर बडगुजर, संदीप माने, मनोज पाटील, नरेंद्र बाविस्कर, जोशी व चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ राहुल सोनवणे, नितिन वाल्हे, पोलीस नाईक महेंद्र पाटील, भुषण पाटील, अमित बाविस्कर, पोकाँ समाधान पाटील, ज्ञानेश्वर गिते व महामार्ग पोलीस स्टेशन चे पोहेकाँ गणेश काळे, विरेंद्र शिसोदे, शांताराम थोरात, सुशिल पाटील, योगेश पवार, विकास खैरनार, पोना जितेंद्र माळी, पोकाँ ललित महाजन, गणेश पवार यांनी सर्वांनी तात्काळ मदत कार्य केले.