बीड (वृत्तसंस्था) पतीच्या निधनानंतर आईने तळहाताच्या फोडाप्रमाणे १८ वर्ष मुलाचा सांभाळ केला. पण काळाने घात केला आणि तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झाला. मुलाचा मृतदेह बघितल्यानंतर आईने केलेला आक्रोश काळीज चिरणारा होता. अजिंक्य अशोक कदम (वय १८ वर्षे) असे मयताचे नाव आहे.
धारूर तालुक्यातील बीड- परळी महामार्गावरील धारूर तालुक्यातील भोपा पाटीजवळ शनिवारी सायंकाळी एक अपघात झाला होता. विशेष म्हणजे पाच दिवसापुर्वी ही याच रस्त्यावर ऑटो व कारचा अपघात होऊन त्यातही तीन जण गंभीर जखमी झाले होते. तेलगावहून गावी भोपा येथे रिक्षातून येत असताना परळीकडून आलेल्या भरधाव स्विफ्ट कार (क्र.एम.एच.०६ बी.एम. ०३८७) ने रिक्षाला धडक दिली होती. यात हनुमान मुंडे, अजिंक्य कदम, श्याम वाघचौरे व तुषार मुळे हे जखमी झाले होते.
यातील गंभीर जखमी झालेल्या हनुमान व अजिंक्य यांना बीडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते; परंतु उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री अजिंक्यचा मृत्यू झाला. तर हनुमानची प्रकृतीही चिंताजनक आहे. दरम्यान,अजिंक्य लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झालेले आहे. सध्या आईच त्याचा सांभाळ करत होती. आईने अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे अजिंक्यचा सांभाळ केला होता. त्यामुळे अचानक आपल्या मुलाच्या जाण्याने आईने प्रचंड आक्रोश केला. त्याच्या पश्चात आई व एक लहान भाऊ, असा परिवार आहे.