भुसावळ (प्रतिनिधी) महामार्गावर चारचाकीचा कट लागल्याने झालेल्या वादातून तिघांनी भुसावळातील दोन तरुणांवर गोळीबार केला होता. ही घटना साकरी-फेकरी उडाण पुलाजवळ १४ एप्रिलच्या रात्री १० वाजता घडली होती. गोळीबारात जखमी अक्षय रतन सोनवणे (वय २६, रा. भुसावळ) याचा मुंबईत उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला. त्याच्यावर रविवारी पोलिस बंदोबस्तात भुसावळ येथे अंत्यविधी करण्यात आले.
अक्षय सोनवणे व मंगेश काळे हे अन्य दोघा मित्रांसह १४ एप्रिलच्या रात्री कारने वरणगावकडे जेवणासाठी निघाले होते. यावेळी हल्लेखोरांच्या दुचाकीला कट लागल्याने वाद झाले, त्यात करण संतोष सपकाळे याने गावठी पिस्तुलातून अक्षय व मंगेशवर दोन गोळ्या झाडल्या. त्यात अक्षयची प्रकृती खालावल्याने त्याला मुंबईला हलवले होते. उपचारादरम्यान शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. नंतर मृतदेह भुसावळ येथे आणण्यात आला. रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले.
यावेळी स्मशानभूमी परिसरात शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. खडका येथेही आरसीपी प्लाटूनचे जवान बंदोबस्तासाठी तैनात केले होते. याप्रकरणी अटकेत असलेले करण सपकाळे, संतोष सपकाळे व जीवन सपकाळे (रा. खडका) यांच्याविरुध्द दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात येणार आहे. दरम्यान, गोळीबारात जखमी दुसऱ्या तरुणाची प्रकृती स्थिर असून सर्व संशयित अटकेत आहेत.