मुंबई (वृत्तसंस्था) परमबीर सिंग यांनी मोठा खुलासा केला आहे. आपल्याकडे काहीही पुरावे नसून ऐकीव माहितीवरून अनिल देशमुख यांच्या विरोधात वसुलीचे आरोप केले असल्याची माहिती परमबीर सिंग यांच्या वकिलांनी चांदिवाल आयोगासमोर दिली आहे. अनेक दिवसांपासून गायब असलेले परमबीर सिंग सध्या वकीलांमार्फत संवाद साधत आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे माझ्याकडे कुठलेही पुरावे नाही. त्यामुळे मी कॅमेरासमोर साक्ष देण्याकरिता येत नाही, असे आयोगासमोर आज परमबीर सिंग यांच्या वकिलांनी सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर परमबीर सिंग यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे यूनिट हेड असताना अनिल देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितले. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे असे आरोप परमबीर सिंग यांनी केले होते. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरोधातही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल झाले.