धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन देण्याची परवानगी ठाकरे गटाने प्रशासनाकडे मागितली आहे. परंतू स्थानिक प्रशासनाने अद्यापही परवानगी दिलेली नाही.
शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या लेटरपॅडवर धरणगाव तहसीलदार यांना दि. ११ रोजी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याची परवानगी मागण्यात आली आहे. परंतू अद्यापही परवानगी बाबत कुठलीही माहिती श्री. वाघ यांना कळविण्यात आलेली नाहीय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनात या निवेदनात १) कापसाला प्रति टन १०,०००/- रु भाव मिळावा. २) सूर्यफूल पिकाला प्रति क्लि ८,०००/- रु भाव मिळावा. ३) पंतप्रधान पिक योजनेत योग्य नुकसान भरपाई मिळावी. ४) शेतपंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने ८ तास विज पुरवठा मिळावा. ५) शेत पंपाची मागील बिलांची थकबाकीची रक्कम पूर्णपणे माफ करावी. ६) शेतक-यांना शेतकर्ज घेण्यासाठीची सिबिल स्कोअर ची अट रद्द करणेत यावी. ७) सेबी मार्फत शेतमालाची वायदे बाजारावर केलेली बंदी ताबडतोब उठविण्यात यावी. ८) शेतीमालाला उद्योगाचा दर्जा द्यावा. ९) प्रोहत्सनपर अनुदान पात्र शेतक-यांना लवकर मिळावे त्यासाठी मागील सरकारच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी लवकर करावी. १०) १००% अनुदानावर सौर कूपन योजना अंमलात आणावी. ११) रोजगार हमी योजने अंतर्गत केळी पिकांसाठी मिळणारी अनुदानाची रक्कम ३ वर्षाऐवजी २ वर्षात मिळावी, या मागण्यांचा समावेश आहे.
















