गाझियाबाद (वृत्तसंस्था) केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा आजचा ३८ वा दिवस आहे. गाझियाबाद सीमेवर एका वृद्ध शेतकऱ्यानं शौचालयात आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय. आत्महत्या करणाऱ्या ७५ वर्षीय शेतकऱ्याचं नाव काश्मीर सिंह लाडी असं होतं. तसेच काश्मीर सिंह यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केंद्रातील मोदी सरकार आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचाही उल्लेख केलाय.
मृत काश्मीर सिंह उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील बिलासपूरचे रहिवासी होते. एका वृद्ध शेतकऱ्यानं अशा पद्धतीनं आयुष्य संपवण्याच्या घेतलेल्या निर्णयावर शेतकरी संघटनांनी दु:ख आणि आक्रोश व्यक्त केलाय. माझ्या मृतदेहावर माझ्या नातू आणि मुलांच्या हातानं अंत्यसंस्कार व्हावेत तसंच हे अंत्यसंस्कार दिल्ली – उत्तर प्रदेशच्या सीमेवरच केले जावेत, अशी अंतिम इच्छा काश्मीर सिंह यांनी आपल्या ‘सुसाईड नोट’मध्ये व्यक्त केलीय. काश्मीर सिंह याचं कुटुंब मुलगा आणि नातूही आंदोलनात आपलं योगदान देत आहेत.