जळगाव (प्रतिनिधी) रेल्वेच्या धडकेत तापी पाटबंधारे विभागातील बळीराम माधव मराठे (वय ५६, रा. सहयोग कॉलनी, पिंप्राळा) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास आशाबाबा नगरजवळील रेल्वेरुळावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील पिंप्राळा परिसरातील सहयोग कॉलनीत बळीराम मराठे हे वास्तव्यास होते. तापी पाटबंधारे विभागात क्लर्क म्हणून नोकरी करीत होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास आशाबाबा नगरजवळील अपलाईनवरील खांबा क्रमांक ४१७ जवळील ८ ते १० च्या दरम्यान, रेल्वेची धडक लागल्याने बळीराम मराठे यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती लोकोपायलट यांनी रेल्वे पोलीसांना दिली. त्यानुसार आरपीएफ विनोद साळवे यांच्यासह रामानंद नगर पोलीस ठाण्यातील पोहेकॉ राजेश चव्हाण, पोलीस नाईक कालसिंग बारेला, नितेश बच्छाव, अजीज शहा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन मृतहेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.
याप्रकरणी बळीराम मराठे यांना रेल्वेची जबर धडक बसल्यामुळे त्यांच्या शरिराचे तुकडे होवून अनेक भाग चेंदामेंदा झाला होता. त्यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या पाकीटातील आधारकार्ड, नोकरीच्या ठिकाणावरील ओळखपत्र व ड्रायव्हींग लायसन्सवरुन त्यांची ओळख पटली.
घटनेची माहिती मिळताच बळीराम मराठे यांच्या मुलीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मुलीने वडीलांना मृतदेह बघण्यासाठी आग्रह केला. मात्र पोलिसांनी तीला रोखल्यामुळे मुलीने एकच आक्रोश केला होता. थोड्यावेळानंतर बळीराम मराठे यांच्या जावई यांनी त्यांची ओळख पटवली.