जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रस्त्यांचे व गटारींचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे सुरु आहे. परंतु या कामांची कुठलीही तांत्रिक बाजू न तपासता व कुठलेही नियोजन न करता ही कामे केली जात आहे. ही कामे करतांना भुयारी गटारींसाठी तयार केलेले होल बुजले गेल्याची दाट शक्यता असल्याने या कामांची सखोल चौकशी करुन संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या मागणीचे पत्र शिवसेना ठाकरे नेते गटाचे गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहर महानगरपालिकेच्या हद्दीत रस्ते आणि भुयारी गटारींची कामे करतांना मनपा व सार्वजनिक बांधकाम विभाग हे भुयारी गटारींमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा किंवा रस्त्यावर येणाऱ्या पाण्याचा निचरा कसा होईल यांचे कुठलेही नियोजन केले नाही. तसेच त्यांनी कुठलीही तांत्रिक बाजू न तपासून पाहता केवळ त्यांच्याकडन रस्त्यांचे कामे केली जात आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची कामे करतांना भुयारी गटारींसाठी केलेले चेंबर बुजले गेल्याची दाट शक्यता आहे. तसेच सद्यस्थितीला नागरिकांची घरे व रस्ता हा घरापेक्षा उंच पातळीवर होत असल्याने येणाऱ्या पावसाळ्यात रस्त्यावर पाणी आल्यास ते पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरणार आहे. त्यामुळे नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागणार आहे. तसेच जी घरे खाली असतील त्या घरांमध्ये पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी त्यांच्या घरात घुसून त्यांचा संसार उद्धवस्त होईल. त्यामुळे सुरु असलेली भुयारी गटारी व रस्त्यांची यांचे कामे कुठलेही नियोजन दिसत नाही. त्यामुळे शासनाचा प्रचंड पैसे खर्च होवून देखील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
मक्तेदारांची जबाबदारी निश्चित करुन कारवाई करा !
महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या गलिच्छ नियोजनामुळे नागरिकांना हाल अपेष्टांसह रोगराईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच विनाकारण रस्ते परत फोडले जाईल आणि पुन्हा दहा वर्ष नागरिकांना त्रास होईल. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांसह कर्मचारी व मक्तेदार यांची जबाबदारी निश्चित करुन कारवाई करावी. अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे नेते गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.