मुंबई (वृत्तसंस्था) न्यायालयाने मनाई करूनही राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी माघार घेतलेली नसून, संप चिघळला आहे. राज्यात काम बंद झालेल्या आगारांची संख्या ३७ वरून गुरुवारी ५९ वर पोहोचली. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीला २३ पैकी २२ कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
मात्र मनाई आदेश धुडकावत संप केल्यामुळे कोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अजयकुमार गुजर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. गुजर यांनी शुक्रवारी अडीच वाजता न्यायालयात हजर राहून प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
औरंगाबाद, बीड, पाटोदा, गेवराई, परळी, आंबेजोगाई, आष्टी, माजलगाव, धारूर, तुळजापूर, हिंगोली, गडचिरोली, वसमत, जिंतूर, पाथरी, उरण, वाडा, सोलापूर, मंगळवेढा, नंदुरबार, जत, जामखेड, श्रीगोंदा या आगारांतील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संपात उडी घेतली. बुधवारी ३७ आगारांतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारून सेवा बंद ठेवली होती. त्यात गुरुवारी २२ आगारांची भर पडल्याने संप चिघळला.
एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करा या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी-कामगारांचा राज्यात बेमुदत संप सुरू आहे. आता हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे विलीनीकरणाबाबत राज्य शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने कर्मचारी संघर्ष करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.