मुंबई (वृत्तसंस्था) मनी लाँडरिंग प्रकरणात दोन नोव्हेंबरपासून अटकेत असलेले माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणी काही थांबताना दिसत नाहीये. अनिल देशमुखांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या अगोदर न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या विशेष सुट्टीकालीन एकलपीठाने रविवारी रद्द केला होता. तसेच देशमुख यांना १२ नोव्हेंबपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली गेली होती. त्यानंतर त्यांची कोठडीची मूदत संपल्यामुळे त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले होते. आता पुन्हा एकदा त्यांना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.