मुंबई (वृत्तसंस्था) सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदललं जाणार ? अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. अनिल देशमुख यांच्याकडेच गृहमंत्रीपद राहणार आहे. राज्यात कोणतंही खातेबदल होणार नाही. त्यामुळे वावड्या उठवण्याची गरज नाही, असा खुलासा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्यामधील सचिन वाझे यांचा कथित सहभाग या मुद्द्यांवरून मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर आणि एकंदरीतच गृहमंत्रालयाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं होतं. या प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच राजीनामा घेतला जाण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. “अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून व्यवस्थिक कारभार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा कोणताही विषय पक्षासमोर नाही, त्यामुळे यावरून वावड्या उठवण्याची गरज नाही”, असं जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.
जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, “सरकारमध्ये कोणताही खातेबदल होण्याची चर्चा नाही, त्यामुळे कोणीही वावड्या उठवू नये. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचं कोणतंही कारण नाही. ते आपलं काम व्यवस्थित करत आहे. त्यामुळे असा कोणताही प्रस्ताव पक्षासमोर नाही.” सचिन वाझे प्रकरणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “सरकार ठाम मताचं आहे. कोणी काही चुका केल्या असतील किंवा कोणी एखाद्या प्रकरणात सहभागी असेल, तर त्यात कोणाचीही बाजू घेण्याचा प्रश्न नाही. तसेच तसा विचारही सरकारमध्ये कोणीही करत नाही.” पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “सचिन वाझे प्रकरणावर गृहमंत्र्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. सचिन वाझे यांना एनआयएनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ज्या गोष्टी एनआयएच्या तपासातून समोर येतील, त्यामध्ये कोणीही दोषी आढळलं तर त्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. हिच सरकारचीही भूमिका आहे. सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही.”
“एखाद्या घटनेचा तपास एनआयए करत आहे. त्यांनी त्या गुन्ह्याचा तपास केलाय, एटीएसदेखील तपास करत होतं. त्यांचाही तपास सुरु होता. पण दरम्यानच्या काळात एनआयएच्या हातात तो तपास गेला आहे. या प्रकरणातील ज्या बाबी एनआयएच्या समोर आल्या, त्याचप्रमाणे त्यांच्या समोरही येत असतील. त्यामुळे पुढिल तपासात त्यांना जी माहिती मिळेल, त्यानुसार पुढे कारवाई होईल.” असं जयंत पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये आज झालेल्या बैठकीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “सरकारसमोर वेगवेगळ्या राज्यांचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या राज्यांचे विषय आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत असतात. त्यांच्याशी चर्चा करत असतात.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “सरकारमधील खातेबदलाबाबत कोणताही प्रश्न नाहीये. कोणत्याही परिस्थितीत असे बदल करण्याची आवश्यकता नाहीये.” गृहमंत्रीपदासाठी जयंत पाटील, अजित पवार यांच्या नावाची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “नावं अनेकांची चर्चेत येऊ शकतात. नावं आली म्हणजे खातेबदल होईल असं नाही. तसेच अशी नावांची चर्चा करण्याची आवश्यकताही नाही. आमचे गृहमंत्री अनिल देशमुखचं राहणार. अशा वावड्या उठवण्याची ही पद्धत आहे. तुम्हाला हिरवा कंदिल, यांना हिरवा कंदिल. मला वाटतं व्यवस्थितपणे काम सुरु आहे. त्यामुळे त्यामध्ये बदल करण्याची आम्हाला खातेबदल करण्याची आवश्यकता वाटत नाही.”
परमबीर सिंग यांच्यावरही टांगती तलवार?
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर सीआययूमधील त्यांचे सहकारी रियाज काझी यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी त्यांची चौकशी सुरू आहे. यामध्ये विरोधकांकडून पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून त्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सचिन वाझे, रियाज काझी हे अधिकारी थेट परमबीर सिंग यांच्या हाताखाली येत असल्यामुळे त्यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

















