जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, जळगाव यांचेसाठी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी विविध योजनेचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यासाठी बीजभांडवल योजनेचे ३६, थेट कर्ज योजनेचे रक्कम १ लक्षपर्यंतचे १०९, वैयक्तिक व्याज परतावा योजनेचे ६५ व गट कर्ज व्याज परतावा योजनेचे १२चे उद्दिष्ट प्राप्त आहेत. जळगाव जिल्ह्यातील पात्र लाभार्थींनी या योजनेसाठी अर्ज करावे. असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक यांनी केले आहे.
महामंडळामार्फत २०% बीज भाडवल योजना राबविण्यात येते. ही योजना राष्ट्रीयकृत बॅकेच्या माध्यमातून राबविण्यात येते. यात एकूण मंजुर कर्ज रक्कमेत महामंडळाचा सहभाग २०%, बॅकेचा सहभाग ७५% व लाभार्थीचा सहभाग ५% आहे. कर्जाची मर्यादा ५ लाख रुपये असून कर्ज परतफेडीचा कालावधी ५ वर्ष आहे. थेट कर्ज योजनेतंर्गत कर्ज मर्यादा १ लाख रुपये असून अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर किमान ५०० आवश्यक कर्ज परतफेडीचा कालावधी ४ वर्ष असून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज आकारण्यात येत नाही.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना बॅकेमार्फत राबविली जाते, कर्जमर्यादा १० लाख रुपये असून ऑनलाईन महामंडळाच्या या वेबपोर्टलवर www.msobcfdc.org ऑनलाईन नावनोंदणी करुन कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. कर्ज रक्कमेचा हप्ता नियमित भरल्यास व्याजाची रक्कम अनुदान स्वरुपात लाभार्थीच्या आधारलिंक बॅक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये ८ लाखापर्यंत आहे.
लाभार्थी अर्जदार इतर मागास प्रवर्गातील असावा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, एकत्रित कुटूंबांचे सर्वमार्गानी मिळणारे वार्षीक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे, केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेचा थकबाकीदार नसावा. वयोमर्यादा १८ ते ५० वर्ष, पात्र निकषात बसणाऱ्यांनी अर्जासाठी व अधिक माहिती तसेच अटी व शर्तीसाठी आधारकार्ड, जात प्रमाणपत्रासह जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ कॉलनी रोड, जळगाव या कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२५७-२२६१९१८ असा आहे. असे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.