जळगाव (प्रतिनिधी) कुसुंबा गावात दोन जणांवर एका टोळक्याने चाकू, चॉपरने हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सर्व सहा संशयितांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, २५ ऑक्टोंबर रोजी १० वाजेच्या सुमारास संतोष सुभाष कोळी हा तुळजाई नगर येथे देवी दर्शनासाठी आला होता. यावेळी गुरु उर्फ दत्तू नारायण चौधरी (वय २७, रा. दत्त मंदिराजवळ तुकारामवाडी) याने काहीएक कारण नसताना संतोषच्या छातीवर व डाव्या पायासह कमरेवर दोन वार केले. त्यानंतर पंकज घोडके सोबत मोटरसायकलवरून उपचाराकरिता डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव खुर्द येथे जात असताना कुणाल सुरेश पाटील (वय २९, रा. तुळजाई नगर, कुसुंबा) राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय ३२,रामेश्वर कॉलनी जळगाव) मयुर उर्फ मनोज शालिक चौधरी (वय २५, रा. दत्त मंदिराजवळ तुकारामवाडी), करण सुदर्शन मनोहर (वय २१, रा. सुप्रीम कॉलनी) सागर यशवंत अवतारी उर्फ अवतारे (वय २१, रा. कुसुंबा) या सर्वांनी संतोष व पंकजला बेदम मारहाण केली. त्यांच्यावर चॉपरने वार करून गंभीर जखमी केले. तसेच दोघांच्या खिशातील पाकीट व मोबाईल जबरीने हिसकावून घेतले. याप्रकरणी भादवि कलम ३२९ ३२६, १४३, १४७,१४८,१४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर आरोपींबाबत उपविभागीय अधिकारी कुमार चिंता यांना गुप्त माहिती मिळाल्यावर लागलीच पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इमरान सैय्यद, सचिन पाटील, किशोर पाटील, सुधीर साळवे, योगेश बारी अशांना रवाना केले होते. पोलिसांच्या पथकाने सदर ५ आरोपी यांना रात्री १० वाजता आदर्शनगर जळगाव येथून ताब्यात घेतले होते. तर सहावां आरोपी कुणाल यास आज सकाळी सिंधी कॉलनी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. यातील राहुल बिराडे व गोलु चौधरी यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, सर्व आरोपींना आज रोजी न्यायमूर्ती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे सरकारी वकील प्रिया मेढे यांनी युक्तिवाद केला. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे रतिलाल पवार करीत आहे.