चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील हिरापुर रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर मातीचे भरलेल्या ट्रॅक्टरचा अचानक टायर फुटल्याने ट्रॉली उलटली. या अपघातात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली दोन मजूर दबल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना आज घडली.
यावेळी रस्त्याने खासदार उन्मेश पाटील हे जात असताना तात्काळ त्यांनी अॅम्ब्युलन्स बोलावून ग्रामीण पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना घटनेबाबत माहिती देऊन ट्रॉलीखाली दबलेल्या मंजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले.
याबाबत वृत्त असे की, माटीचे भरलेल्या ट्रॅक्टरचा (विनानंबर) अचानक टायर फुटल्याने हिरापुर रेल्वे स्थानकाजवळ नांदगाव रस्त्यावर ट्रॉली उलटून त्याखाली दबल्याने दोन मजूरांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत सागर रमेश कोळी (वय- २८ रा. पाटखडकी बायपास) व बंडू भास्कर जाधव ( वय-३० रा. रांजणगाव) ता. चाळीसगाव या दोघांचा अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. यात सागर रमेश कोळी यांच्या पाश्चात्य आई-वडील, पत्नी व दोन मुले आहेत. तर बंडू भास्कर जाधव यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. याबाबत उशिरापर्यंत ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करणे सुरू होते.