पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा युद्ध पेटण्याचे चिन्ह आहे. ‘नाथाभाऊ हे आजही नेते आहेत. आमच्या पक्षात कोणतीही अस्वस्थता नाही. त्यामुळे निदान तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरं बोलायला पाहिजे, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना जोरदार टोला लगावला.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा टोला लगावला आहे. नाथाभाऊ आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरं बोलावं. दीड वर्षात त्यांनी एकही आंदोलन केलं नाही. आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपूरही जिंकलो, असं सांगतानाच आम्हाला फसवलं गेलं याचं आम्हाला दु:खं आहे. आमच्याशी धोका झाला. पण भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही, असं पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी अनलॉकच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवर टीका केली. वारंवार टीकेचा स्वभावही नाही अन मुद्दाही नाही. पण ठाकरे सरकारमध्ये कोणत्याही गोष्टीवर एकवाक्यता नाही. प्रत्येकाला प्रेस समोर येण्याची घाई झाली आहे, असं ते म्हणाले. संजय राऊत यांच्यावर मी काही बोलणार नाही. माझा दिवस कशाला खराब करता. त्यांनी पुण्यात ८० नाहीतर २८० जागा लढवाव्या, त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.