धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेल्या वनीकरण गट क्रमांक 1248 मध्ये केबल वायर जाळून तांबे वजा इतर धातू काढण्याच्या प्रयत्नात असतानाच वनविभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात अधिक असे की मागील काही दिवसापासून धरणगावातील वनीकरणात आग लागण्याच्या घटना उघडकीस येत होत्या. त्याअनुषंगाने वनविभागाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. आज अचानक धरणगाव वनीकरण गट क्रमांक 1248 मध्ये असलम शेख आणि मुशर्रफ अली निसार हे दोघे तरुण केबल वायर जाळण्याच्या प्रयत्न करत होते. परंतु तत्पूर्वीच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. राजवड वनपाल अनिल साळुंखे आणि धरणगावचे वनरक्षक एन. एन शिरसागर यांनी ही कारवाई केली. दरम्यान, वनपाल अनिल साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दोघांना वेळीच रोखल्यामुळे जंगलात पुन्हा आग लागण्याचा प्रकार घडला नसल्याचेही त्यांनी सांगितले. दोघा संशयितांना धरणगाव पोलीस स्थानकात ठेवण्यात आले आहे.
















