मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने (supreme court parambir singh case) राज्य सरकारला झटका दिला आहे. परमबीर सिंग (Parambir Sinha) प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे (CBI) सोपण्यात यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली.
परमबीर सिंगानी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेप्रमाणे त्यांना कारवाईपासून संरक्षणही मिळाले होते. त्याचबरोबर त्यांनी आपल्यावरील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा अशी मागणीही सर्वोच्च न्यायलायाकडे केली होती. त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यावरील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारकडून सिंग यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलिस आणि सीआयडीकडून सुरू होता. मात्र, आता महाराष्ट्र सरकारला हा मोठा झटका म्हणावा लागेल. कारण, या सर्व प्रकरणांचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात येईल. त्यामुळे सीबीआयकडून या सर्व प्रकरणांचा तपास कसा केला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पाच गुन्ह्यांचा होणार तपास
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये परमबीर सिंग यांच्यावर खंडणी आणि अन्य आरोपांखाली गुन्हे दाखल झाले होते. आतापर्यंत परमबीर सिंग यांच्यावर दाखल झालेल्या पाच गुन्ह्यांचा तपास आता सीबीआयकडे जाणार आहे. हा ठाकरे सरकार आणि राज्यातील तपास यंत्रणांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.