औरंगाबाद (वृत्तसंस्था) राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या देखील निवडणुका होणार असल्याचा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
औरंगाबादच्या (Aurangabad News) फुलंब्री तालुक्यात नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात दानवे यांनी हे विधान केलं आहे. रावसाहेब दानवे पुढे म्हणाले की, हल्लीची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. सोबतच राजकीय घडामोडी होऊन इतर औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला आहे. दानवे यांचे या विधानाने राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून मध्याविधी निवडणूक लागण्याच्या चर्चा सुरू असतानाच दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे.