मुंबई (वृत्तसंस्था) दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृह तीनवेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर दिशा सालियन प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. सध्या ही केस पोलिसांकडे असून कुणाकडे काही पुरावे असतील तर ते द्यावेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत. दरम्यान, सभागृहात सत्ताधाऱ्यांचा गोंधळ लोकशाहीसाठी घातक, सीबीआयवर विश्वास नाही का?, अशा शब्दात अजित पवारांनी सुनावले.
राहुल शेवाळेंनी सुशांतसिंह राजपूत प्रकरण लोकसभेत उपस्थित केल्यानंतर शिंदे गट आणि भाजपाने दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभा आणि विधानपरिषदेत आदित्य ठाकरेंना घेरण्याचं प्रयत्न केला. दिशा सालियन प्रकरणावरून विविध प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी शिंदे गट आणि भाजपाने केली होती. याप्रकरणावरून झालेल्या गोंधळामुळे पाचवेळा विधानसभा तहकूबही करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियनचे प्रकरणत मुंबई पोलिसांकडे आहे. याप्रकरणाचे ज्यांच्याकडे पुरावे असतील, त्यांनी द्यावे. यासंदर्भात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल,” अशी घोषणा केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पोलिसांकडे केस सुरु आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे याचे पुरावे आहेत त्यांनी ते द्यावे. दिशा सालियन केस कधीही सीबीआयकडे गेली नाही. सुशांतसिंग यांची केस सीबीआयकडे होती. नविन पुरावे आले असतील तर त्यांची चौकशी केली जाईल.
विधिमंडळाबाहेर मविआ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांच्या या वर्तवणुकीचा तीव्र शब्दांत निषेध केला. अजित पवार म्हणाले, दिशा सालियनचा मृत्यू झाला तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हा आमच्या सरकारवर विश्वास नाही म्हणून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. नंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास करत दिशा सालियानने आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले व न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यामुळे हे सगळ प्रकरण संपलेले असताना सत्ताधाऱ्यांकडून उगीचच या प्रकरणाचे खुसपट बाहेर काढले जात आहे. आज आम्हाला सभागृहात अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडायचे होते. मात्र, विनाकारण दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणावरून गोंधळ करत सत्ताधारी सभागृहाचा वेळ वाया घालवत आहेत, असेही अजित पवार म्हणाले.
एका मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्याची चौकशी मुंबई पोलीस करतात. त्या चौकशीत दोनदा तपास अधिकारी बदलला जातो. ८ जूनच्या रात्री कोण कोण उपस्थित होता. कुणाच्या राजकीय दबावापोटी हे प्रकरण दडपण्यात आले. दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नसून मुंबई पोलिसांकडे ही केस आहे. सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले. ८ जूनच्या पार्टीत कोण होते? या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्या रात्री कुठला मंत्री होता? काहीतरी लपवण्यासाठी विरोधक गोंधळ घालतायेत का? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी केला होता. सरकारने या प्रकरणाची फेरचौकशी करावी अशी मागणी सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आली.
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी केली. सुशांत सिंग, दिशा सालियान प्रकरण समोर येतं तेव्हा आदित्य ठाकरेंचेच नाव का घेतले जाते? असा सवाल उपस्थित करत दाल मे कुछ काला है असं राणे म्हणालेत. तर ए फॉर आदित्य म्हणत शेवाळेंच्या आरोपांना राणेंनी दुजोरा दिलाय. तसंच मुंबई पोलिसांनी दिशा सालियन केस रिओपन करावी अशी मागणी त्यांनी केलीय. नितेश राणेंपाठोपाठ बडनेराचे आमदार रवी राणाही आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी केलीय. उद्या विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचं रवी राणांनी सांगितलं.