जळगाव (प्रतिनिधी) शुक्रवारी एलसीबीच्या पथकाने भुसावळात तब्बल ५०० किलो गांजा पकडला. गुप्त माहितीच्या आधारे जळगाव एलसीबीच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. (Jalgaon Police)
भुसावळ शहरात बाहेर गावावरून एक वाहनामध्ये गांजा येत असल्याची गोपनीय माहिती एल.सी.बी.चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ एक पथक भुसावळला रवाना करून जळगाव रोडवर सापळा लावण्यास सांगितले. गुरुवारी रात्री पथकाला १०.१५ वाजेच्या सुमारास जळगाव रोडवरील जॉली पेट्रोल पंपाजवळ पुलाखाली एक वाहन बरेच वेळ थांबलेल्या अवस्थेत दिसले. यामुळे पथकाला शंका आली. पथक पाहणी करण्यासाठी गेले असता वाहनांमध्ये ड्रायव्हर नव्हता.
पथकाने लागलीच याबाबत अधिकाऱ्यांना कळविले. अधिकाऱ्यांच्या आदेशावरून पथक रात्रभर वाहनावर लक्ष ठेवून होते. गुरुवारी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी वाहन असलेल्या ठिकाणी दुपारी दोन वाजेला भेट दिली. आणि वाहन भुसावळ तालुका पोलील स्टेशनला आणण्याचे आदेश दिलेत. पथकाने केलेल्या चौकशीत वाहनात वाहनांमध्ये गांज्याच्या १६ बॅग पाच किलो वजनाचे असे ४० गठ्ठे एकूण ५०० किलो ६०० ग्रॅम असा ७५ लाखांचा गांजा, नऊ लाखांचे इलेक्ट्रिक साहित्य मिळून आले. पथकाने दहा लाख रुपयांच्या आयशर वाहनासह सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. वाहनातील चालकाला स्थानिक गुन्हे शाखा पथकातील उपनिरीक्षक गणेश चौबे, कर्मचारी सचिन महाजन, प्रमोद लाडवंजारी, अक्रम शेख अशांनी मालेगाव येथून ताब्यात घेतले आहे.