मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना पक्षुप्रमुख उद्धव ठाकरे नव्या पक्षचिन्हाच्या तयारीत आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह सोडून इतर कोणतंही चिन्ह मिळालं तरी कंबर कसून हे चिन्ह घराघरात पोहोचवण्याची तयारी ठेवा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केल्याचं कळतंय. यावर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना पक्षुप्रमुख उद्धव ठाकरे नव्या पक्षचिन्हाच्या तयारीत असल्याच्या बातमीवर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना सुवर्णमध्य काढण्याची विनंती केली आहे. केसरकर म्हणाले की, अजूनही वेळ गेलेली नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली तर हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने हा योग्य निर्णय होईल, असंही केसरकर म्हणालेत. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी टीव्ही ९ च्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना आवाहन केलं. फोनवर बोलताना ते म्हणाले, ‘ वेळ गेलेली नाही. वरिष्ठ नेत्यांशी बोलले तर निश्चित मार्ग निघू शकतो. शेवटी वरिष्ठांच्या पातळीवर हे सगळं चालतं. आपल्या पक्षाचे आणि भाजपचे प्रमुख मोदी, अमित शहा, नड्डा आहेत. अनेक वर्षांचे मित्र आहेत. काही कारणामुळे दूर गेले असतील, तर ते जवळ येतील. आम्ही विधीमंडळात एका गटात आलेलो आहोत. महाराष्ट्राच्या विकासासाठी काम सुरु झालं आहे. हे विकास कार्य सुरु असताना सगळ्यांनी एका दिशेने काम करानं हे महत्त्वाचं आहे. हा निर्णय स्वतः उद्धव साहेब घेऊ शकतात. योग्य ते निर्णय घ्यावा, एवढीच आम्ही प्रार्थना करू शकतो. या बाबतीत मी निश्चितपणे आशादायी आहे, असंही केसरकर म्हणाले.