सासाराम (वृत्तसंस्था) बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदीही एनडीएच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, तुम्ही ‘ज्यांना’ सत्ता दिली परंतु ‘त्यांनीच’ सत्तेचा व्यवसाय केला असल्याची टीका केली. सासाराम येथे आयोजित रॅलीला संबोधित करताना तेजस्वी यादवांसह विरोधकांवर टीकास्त्र डागले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचा महाआघाडी विरुद्ध एनडीए असा राजकीय सामना रंगलेला दिसत असून, पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह महाआघाडीवर हल्लाबोल केला.
मोदी म्हणाले,”एनडीए सरकारने कलम ३७० रद्द केले. पण, हे लोक (विरोधक) म्हणत आहेत की, ते सत्तेवर आल्यानंतर कलम ३७० पुन्हा परत आणणार, असे बोलल्यानंतरही ते बिहारमध्ये मत मागण्याचे धाडस करत आहेत. जे राज्य आपल्या मुलामुलींना देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पाठवणाऱ्या बिहारचा हा अपमान नाही का?,” अशी टीका मोदी यांनी केली
सत्तेतून बेदखल केल्यानंतर हे लोक भ्रमिष्ट झाले आहे. राजदने युपीएमध्ये राहून बिहारी लोकांवर आपला राग काढला. राजदने नितीश कुमार यांचे दहा वर्ष वाया घालवले. नंतर १८ महिन्यांचे सरकार आले, तेव्हा काय काय खेळ खेळले हे सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा नितीश कुमार यांना हा खेळ समजला, तेव्हा त्यांना सत्ता सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. बिहारच्या भविष्यासाठी आम्ही नितीश कुमार यांच्यासोबत आलो आहे.