पटना (वृत्तसंस्था) बिहार विधानसभेसाठी आज पहिल्या टप्प्यातील ७१ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. मतदान सुरू होण्याआधी औरंगाबादच्या बालूगंज येथे दोन आयईडी (IED) सापडल्यामुळे प्रचंड खळबल उडाली. सीआरपीएफने (CRPF) शोध मोहिमेदरम्यान हे आयईडी निकामी असून हा परिसर नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.
बिहारमध्ये ३ टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. आज पहिल्या टप्प्यात ७१ जागांवर मतदान सुरू आहे. या ठिकाणी १ हजार ६६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ९५२ पुरुष आणि ११४ महिला आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ १ तासाने वाढवली आहे. परंतु, वेगवेगळ्या जागांवर मतदानाचा कालावधी संपण्याची वेळ वेगळी आहे. ४ जागांवर सकाळी ७ ते ३ पर्यंत मतदान होणार आहे. तर २६ जागांवर संध्याकाळी ४ पर्यंत,५ जागांवर ५ वाजेपर्यंत आणि इतर ३६ जागांवर ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.