जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देवून मैदानात उतरविले आहे. ही निवडणूक बिनविरोध न करता भाजपने आपला पाचवा उमेदवार मैदानात उतरवून निवडणूक अटीतटीची केली आहे. यात भाजपाचा खरा निशाना एकनाथराव खडसे हेच असल्याचे सांगितले जात आहे.
विधानपरिषद निवडणुकीत सध्या विजयी मतांचा कोटा २६ वर आला आहे. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्या मताचा कोटा पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे खडसे यांना निवडून येण्यासाठी केवळ तीन मताची अधिक आवश्यकता आहे. शिवसेनेकडे अतिरिक्त मते आहेत. ती मते मिळाल्यास त्यांचा विजय अवघड नाही, शिवाय खडसे यांचे इतक्या वर्षाची राजकीय कारकिर्द पाहता त्यांचे भाजपसह सर्वच पक्षात सौदार्हाचे संबंध आहेत. त्यामुळे त्यातूनही काही मते त्यांना मिळू शकतात.
परंतु भाजपने गुप्त मतदान पध्दतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेच्या मतात फुट पाडून ही मते आपल्या पदरात पाडून घेतल्यास खडसे यांचा घात होवू शकतो, असेही सांगितले जात आहे. खडसे यांचा पराभव हाच भाजपचा रणनितीचा मोठा विजय असणार आहे. राज्यसभा निवडणूकीत संजय पवार टार्गेट ठेवून भाजपने खरा निशाणा संजय राऊत यांच्यावर लावला होता. मात्र ते थोडक्यात बचावले. अगदी असाच सापळा खडसे यांच्यासाठी लावण्यात येवू शकतो. त्यामुळेच भाजपचे अनिल बोंडे म्हणाले, ‘भाई’ किंवा ‘भाऊ’ कोणीही एक पराभूत होवू शकतो.