मुंबई (वृत्तसंस्था) पोपट पिंजऱ्यात अडकणार आहे म्हणून हे राक्षसी विचारांचे, भाजपचे लोक घाबरले आहेत. कारण पोपट पिंजऱ्यात गेला तर आणखी गोष्टी उघड होतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच समीर वानखेडे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी यांच्या निकाहाचा फोटो परवानगीनेच जाहीर केल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि भाजपवर गंभीर आरोप केले. ‘२ ऑक्टोबरला जो व्यक्ती आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जात होता. तो व्यक्ती पोलीस कोठडीत आहे. जो व्यक्ती आर्यन खानसह त्याच्या साथीदारांना जामीन मिळू नये म्हणून ताकद लावत होता. काल त्याने न्यायालयता धाव घेतली. मुंबई पोलिसांनी सुरू केलेला तपास सीबीआय किंवा एनआयएकडे द्यावा. पोलिसांनी सांगितलं की, समीर वानखेडेंना अटक करायचं असेल, तर नोटीस दिली जाईल. त्यामुळे पूर्ण घटनाक्रमच बदलला आहे’, असं मलिक म्हणाले.
‘एका महिन्याच्या कालावधी दररोज गोष्टी बदल आहेत. वानखेडे यांनी सर्व गोष्टी करून बघितल्या. कुटुंबाला आणलं जात असल्याचं ते म्हणाले होते. पण मी यात त्यांच्या कुटुंबीयांना यात खेचलं नाही. त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल बोललो, कारण ज्यांच्या फोटो आहे, त्यांची इच्छा होती म्हणून मी तो फोटो सार्वजनिक केला. माझा लढा अन्यायाविरुद्ध आहे. बेकायदेशीर फसवण्यात आलेले लोक मुंबईतील तुरुंगात बंद आहेत’, असा दावाही मलिक यांनी केला.
‘मी ७० वर्षांपासून महाराष्ट्रात राहतोय. मग नवाब मलिक महाराष्ट्राचा नाहीये का? संपूर्ण भाजप त्यांच्या पाठीमागे उभी राहिली आहे. किरीट सोमय्यासोबतच्या भेटीचा फोटो व्हायरल झालाय. माझी जी शंका होती की, जिन्नचा जीव या पोपटात आहे. त्यामुळे पोपट पिंजऱ्यात अडकणार आहे म्हणून हे राक्षसी विचारांचे, भाजपचे लोक घाबरले आहेत. कारण पोपट पिंजऱ्यात गेला तर आणखी गोष्टी उघड होतील’, असंही मलिक म्हणाले.