मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. कुठल्याही गोष्टीत टीका करण्याची भाजपची जुनीच सवय आहे. भाजपचे काही लोक त्यात आघाडीवर असतात, अशा लोकांना भारतरत्न पुरस्कारच दिला पाहिजे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
‘हे फुटतील, इतके फुटतील, अशी जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात आहे. थोडे दिवस थांबा काय काय फुटणार आहे ते बघाच. भविष्यात जे जे घडणार आहे, राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदु शिवसेना भवनच असेन, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संकेत देत भाजपला सुनावलं. भाजपची नाशिकमधील उद्योग आघाडी आता आपल्याकडे आली आहे. त्यामुळे भाजपकडे आता उद्योग राहिलेले नाहीत, अशी खोचक टीका देखील संजय राऊत यांनी केली. नाशिकचे शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी ‘शिवबंधन’ तोडून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांच्या घरवापसीमुळे नाशिक, धुळे जिल्ह्यातील शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपचे शेकडो पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय राऊत यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, भविष्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊत पुढे म्हणाले की, भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत असतात. टीका करणाऱ्या भाजपच्या काही लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. भाजपमधील काही लोकांना पीएचडी तर काहींना डीलिट दिली पाहिजे. त्यांना लोकं मारायची आहेत. मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आहे. संचारबंदी लावण्याचा मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही, तुमचा जीव वाचावा म्हणून त्यांनी संचारबंदी लागू केली आहे, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी यावेळी दिली.
‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक महिन्यांपासून परदेशात गेले नाहीत. त्यामुळे परदेशात कोरोनाची काय स्थिती आहे हे भाजपवाल्यांना कळणार नाही. जरा परदेशात काय चाललं ते पाहा. ब्रिटनमधून होणारी विमानसेवा ४२ देशांनी बंद केली आहे. कशासाठी केली आहे? काही कळतं का भाजपला?’, असा सवालही त्यांनी यावेळी केला.