रावेर (प्रतिनिधी) बोरखेडा हत्याकांडातील मुलीवर शारिरीक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. हाथरस प्रकरणापेक्षाही हे प्रकरण धक्कादायक असल्याचे वक्तव्य माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केले आहे. घटनास्थळी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी आज दुपारी बोरखेडा येथे भेट दिली. त्यांच्या सोबत खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील, माजी उपाध्यक्ष नंदू महाजन आदी मान्यवर होते. आ. महाजन यांनी पिडीत कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी ते म्हणाले की, अगदी रस्त्याला लागून असणार्या घरात झालेले हे हत्याकांड अतिशय दुर्दैवी असून यातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांना कठोर दंड करण्याची मागणी आ. महाजन यांनी केली. ते पुढे म्हणाले की, या प्रकरणात आम्ही काहीही राजकारण आणत नाही. तथापि, हाथरस प्रकरणापेक्षाही हे भयंकर प्रकरण असून याची कसून चौकशी करण्याची मागणी गिरीश महाजन यांनी केली.
हे आहे प्रकरण –
सविता मेहताब भिलाला (वय १४), राहुल (वय ११), अनिल (वय ८) व राणी (वय ५) अशी हत्या करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत. शेतातील रखवालदार पती पत्नी गावाला गेले असताना ही घटना घडली. रावेर शहरापासून फर्लांगभर अंतरावर असलेल्या बोरखेडा रोडवरील मुस्तफा यांच्या केळीबागेच्या शेतातील रखवालदार महेताब गुलाब भिलाला हा पत्नी व मोठ्या मुलासह मुळगावी गढी (ता. बिस्टान जि. खरगोन) येथील चुलतभावाच्या नातवाच्या दशक्रियाविधीसाठी गेला होता. गुरुवारी रात्री घरात गाढ झोपलेल्या सविता, राहुल, अनिल व राणी या चारही मुलांची अज्ञात मारेकऱ्यांनी कुर्हाडीने घाव घालून हत्या केली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.