धरणगाव (प्रतिनिधी) आज दुपारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या पथकाने छापेमारी करत शहरातील दोन धान्य गोडाऊन सील केले आहेत. या कारवाईमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील चोपडा रोडवरील दोन गोडाऊनवर आज दुपारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. गोडाऊनवर पथक धडकल्यानंतर त्यांना गोडाऊन परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागेत धान्य आढळून आले. यानंतर गोडाऊनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात धान्यसाठा आढळून आला.
पथकाने लागलीच गोडाऊन सील केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या पथकाने चोपडारोडवरीलच दुसऱ्या गोडाऊनवर धडक दिली. याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात धान्य आढळून आले. दोघं गोडाऊन सील करण्यात आले आहेत. दरम्यान, थेट जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्यामुळे स्थानिक महसूल प्रशासनाला संबधित गोडाऊन बाबतीत माहिती नव्हती का?, याबाबतची एकच चर्चा गावात रंगली आहे. कारण याआधीही यातील एका गोडाऊनवर तपासणी झाली होती.
आज आम्ही धरणगावातील दोन गोडाऊन सील केले आहेत. या ठिकाणी धान्यसाठा आढळून आला आहे. संबंधीतांकडे माहिती मागितली आहे. संबंधितांना पावत्या दाखवायची देखील सूचना देण्यात आली आहे. त्यांच्याकडून खुलासा आल्यानंतरच कारवाईची दिशा ठरवली जाईल.
-अमन मित्तल (जिल्हाधिकारी, जळगाव)