मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊतांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. आज सकाळीच ईडीकडून संजय राऊतांवर कारवाई सत्र सुरू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बंगल्याबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे.संजय राऊत यांची ईडी केवळ चौकशी करून निघून जाणार की संजय राऊत ताब्यात घेणार असे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सकाळी 7.15 च्या सुमारास ईडीचं हे पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. जवळपास 10-12 अधिकारी त्यांच्या घरी असल्याची माहिती आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांची लूटमार, माफियागिरीचे मी पुरावे दिले होते. महाविकास आघाडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. राज्यातील जनतेची लूट करणाऱ्या संजय राऊतांचा आज हिशोब होणार आहे. संजय राऊतांविरोधात मी पुरावे दिले आहेत. मला विश्वास आहे की, संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार आहे. आता कारवाई सुरु आहे. संजय राऊतांची धावपळ सुरु होती, आता त्यांना हिशोब द्यायला जावंच लागणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले. दरम्यान, आज संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कितीवेळ चौकशी होणार हे कोणी सांगू शकत नाही. कारण यांच्या आगोदर ज्या राजकीय नेत्यांवर चौकशी झाली आहे ती अधिककाळ चालली आहे.