भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार व चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) अशी मयतांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास सुरु होत नाही, तोच मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतचा देखील मर्डर झाला. एकाच रात्री एकामागून एक तब्बल तीन खून झाल्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दोघं भावंडांचा जुन्या वादातून खून !
कंडारी गावातील शांताराम साळुंखे व राकेश साळुंखे या भावंडांचा गावातील एक परीवाराशी जुना वाद असून त्या वादाची ठिणगी शुक्रवारी पडल्यानंतर हल्लेखोरांनी भावंडांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तलवारीसह चाकूचा सपासप वापर करण्यात आल्याने दोन्ही भावंड जागीच गतप्राण झाली तर इंगळे व साळुंखे नामक इसम जखमी झाला असून त्यांना ट्रामा केअर सेंटरला हलवण्यात आले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधिकारी घटनास्थळी दाखल !
कंडारीतील दुहेरी खुनाची घटना समोर आल्यानंतर भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटरमध्ये रवाना करण्यात आले असून हल्लेखोरांची माहिती काढण्याचे काम यंत्रणेने सुरू केले आहे. पोलिसांना आतापर्यंत संशयित म्हणून दीपक छगन तायडे व मनोज मोरे यांची नावे कळाली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
कुविख्यात गुन्हेगार निखीलची चाकू मारून हत्या !
पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार म्हणून निखील राजपूतची ख्याती होती शिवाय यापूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कारवाईदेखील करण्यात आली होती. पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यासह धमकी देणे, खंडणी वसुल करणे, मारहाण करणे यासह गंभीर गुन्ह्यात निखील राजपूत हा प्रमुख संशयित आरोपी होती. शहरातील श्रीराम नगराजवळील पाण्याच्या टाकीजवळ त्याचे वास्तव्य होते. शुक्रवारी रात्री निखील हा घरी आल्यानंतर काही संशयितासोबत पाण्याच्या टाकीच्या टेरेसवर झोपला असता त्याचा वाद झाला व वादातून त्याच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करीत खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून कौटूंबिक वादातून त्याने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे 24 तासांपूर्वीच निखीलसह त्याच्या सहकार्यांनी बाजारपेठ पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसावर हल्ला करून झाला होता फरार !
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी हा फैजपूर हद्दीतील महेंद्र ढाबा येथे येत असल्यांची गोपनीय बातमी पोलीस अधिकारी यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले होते. संशयित आरोपीला महेंद्र ढाबा जवळ रोडवर सापळा रचून ताब्यात घेत असतांना पोकॉ.प्रशांत सोनार यांना (ता. १) सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी निखिल राजपूत याने फायटरने उजव्या डोळ्या खाली मारून धक्का – बुक्की केली. तसेच हल्ला करून डिझायर गाडीतून पळून गेले. म्हणून फैजपूर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी निखिल राजपूत,अनिषा उर्फे मोही रितेश रतनानी सोबत तीन अनोळखी इसमांविरुध्द पोकॉ.प्रशांत सोनार (नेमणूक बाजारपेठ पोलीस स्टेशन) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता .या गुन्ह्याचा अधिक तपास पीएसआय लोखंडे करीत आहे.
पोलीस अधिकार्यांची धाव !
खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगाव पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. श्रीराम नगर भागातील पाण्याच्या टाकीवर रक्ताच्या थारोळ्यात निखील राजपूतचा मृतदेह आढळला असून तो शवविच्छेदनासाठी हलवण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
















