जळगाव – शहरातील वाघ नगर स्टॉपजवळ दुचाकीवरुन आलेल्या ६ ते ८ जणांच्या गटाने तरुणावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचा अंदाज असून दोन दुचाकींची दगड टाकून तोडफोडही करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील वाघ नगर स्टॉप परिसरात अक्षय सीताराम तायडे (वय-२६ रा.समता नगर आणि अक्षय सुरेश लोखंडे (वय-२१ रा.समता नगर) हे दोन तरुण दुचाकी लावून उभे होते. दरम्यान, रात्री १० वाजेच्या सुमारास आठ ते दहा जणांचे टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी दुचाकीजवळ उभ्या असलेल्या तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी टोळक्याने तरुणावर गोळीबार केला. यामध्ये अक्षय तायडे या तरुणाच्या मांडीला गोळी चाटून गेल्याने तरुण जखमी झाला.
टोळक्याने केलेल्या हल्ल्यात अक्षय लोखंडे या तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आला असून तो जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर टोळक्याने त्या तरुणांच्या दुचाकींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी तेथील दगड उचलून दुचाकीवर टाकून त्यांचे नुकसान झाले. यामध्ये दुचाकी क्रमांक (एमएच.१९.बीडी.८६२४ व एमएच.१९.ईडी.८८७९) क्रमांकाच्या दुचाकींचे नुकसान झाले आहे. या घटनमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
दरम्यान, वाद पूर्ववैमनस्यातून झाला असूनमंगळवारी दुपारी एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्यावरून दोन्ही गट भिडले होते. त्यानंतर ते दिवसभर एकमेकांचा शोधाशोध करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर घटना घडून देखील पोलिसांना त्याचा थांगपत्ता देखील नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. तब्बल तासभराने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जिल्हा रुग्णालयात पोहचले. या प्रकरणी रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर पोलीस हल्लेखोराचा शोध घेत होते.दरम्यान, पोलीसांनी मात्र गोळीबार झाला नसल्याचे सांगितले आहे.