अमरावती (वृत्तसंस्था) जिल्ह्यात कोरोनाचे थैमान दिसून येत आहे. आमदार-खासदार विनामास्क सुसाट असल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सरकारने घालून दिलेले नियम पायदळी तुडवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्याने विना मास्क आणि विना हेल्मेट अमरावती शहरात बुलेट वारी केली.
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. अमरावती जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संथ्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आलंय. असं असलं तरी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सरकारने घालून दिलेले नियम पायदळी तुडवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रत्येकाला मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच आता पोलिसांनी प्रत्येक दुचाकी स्वरांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. पण अमरावतीच्या खासदार नवनीत कौर-राणा आणि आमदार रवी राणा यांना मात्र कोरोना वाढतोय याचे गांभीर्य दिसत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे विविध कारणांमध्ये अनेकदा चर्चेत असतात. त्यात रवी राणा यांची आंदोलनं तर नवनीत राणा यांचं लोकसभेतील भाषण आणि ठाकरे सरकारवरील टीका नेहमीच चर्चेत असते. आता हे राणा दाम्पत्य एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलंय. राज्यात कोरोना विषाणू पुन्हा डोकं वर काढतोय. अमरावती जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशावेळी कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. पण नवनीत राणा आणि रवी राणा हे मास्क न घालताच अमरावती शहरातून बुलेटवारी करतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना याआधी कोरोना झाला होता. नवनीत कौर राणा यांना दोन वेळा कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना ऑगस्ट २०२० मध्ये तातडीने मुंबईत हलविण्यात आले होते. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुंबई महापालिकेकडून त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे पालिकेकडून त्यांना पुढील १५ दिवस क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. असे असताना त्यांच्याकडून कोविड-१९च्या नियमांची पायमल्ली कशासाठी, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
यवतमाळपाठोपाठ अमरावतीतही लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झालाय. दर रविवारी जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलीय. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात रविवारी लॉकडाऊनची घोषणा झालीय.
















