मुंबई (वृत्तसंस्था) भाजप दररोज सरकार येईल या आशेवर नवनवीन विषय समोर आणून आज सरकार जाणार, उद्या सरकार जाणार आहे असे बोलत आहे. परंतु हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेलच, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सर्व विरोधकांना एकत्र आणणं हाच शरद पवार यांचा अजेंडा आहे, अशी प्रतिक्रियाही नवाब मलिक यांनी दिली आहे.
नवाब मलिक म्हणाले, “महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे काम करणार आहे. आज सरकार जाईल, उद्या जाईल या आशेवर भाजपा दररोज एक एक नवीन नवीन विषय काढत आहे. आज-उद्या सरकार पडेल अशी एक एक तारीख सांगत आहेत. मात्र त्यांची एकही तारीख योग्य ठरत नाही किंवा त्यांची भविष्यवाणी खरी ठरत नाही.” नवाब मलिक म्हणतात की, “हे सरकार किमान समान कार्यक्रमावर उभारण्यात आलं आहे. सरकारच्या कामावर लोक समाधानी आहेत. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. २०२४ निवडणुकीपूर्वी शरद पवार विरोधकांना एकत्र आणण्याची रणनिती आखत असल्याचं बोललं जात आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारी दुपारी ४ वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोना काळात पहिल्यांदाच विरोधक व्हिडिओ कॉन्फरन्सऐवजी एकत्र बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रमंचच्या माध्यमातून १५ पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांनाही या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र या बैठकीचं काँग्रेसला बोलवणं नाही.