पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर राज्याच्या राजकारणातून अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा भेटी होत असतात. महाराष्ट्रात या कमी झाल्या. अशाप्रकारची भेट राजकीय आहे असं म्हणता येत नाही. पण दोघे तिकडे होते असे पाटील म्हणाले.
“अशा प्रकारच्या भेटी नेहमीच होत असतात. त्यानुसार गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्या दिवशी भेट झाली आहे. पण त्या भेटीत नेमकं काय झाले? हे माहिती नाही. भारतीय संस्कृती हेच सांगते की, राजकारण राजकारणाच्या जागी, राजकारणाच्या व्यतिरिक्त आपण भेटलं पाहीजे मात्र महाराष्ट्रात अलीकडच्या काळात वर्ष दीड वर्षांत ते कमी झाले आहे.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
तसेच ते पुढे म्हणाले की, “अशा प्रकरची भेट म्हणजे काही राजकीय असेलच असे काही नाही. शरद पवार अहमदाबाद येथे एका कार्यक्रमाला गेले होते व अमित शाह हे प्रवासावरून घरी पोहचले होते. यामुळे त्यांची भेट झाली असेल, पण राष्ट्रवादीकडून सतत सांगितले जात आहे की भेट झालीच नाही, हे सांगण्याची स्पर्धाच लागली आहे. यातून ते भेट झाल्याचे दाखवत आहे. पण भेट झाली आहे. मात्र त्यात काय झालं आहे हे माहिती नाही.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जर कुणीही आजारी असेल तर त्याला लवकर आराम पडावा, यासाठी प्रार्थना करायची असते आणि मी महाराष्ट्रच्या कुलस्वामीनी तुळजाभवानीला प्रार्थना करतो की, शरद पवार यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊ दे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.