मुंबई (वृत्तसंस्था) औरंगाबाद शहराच्या नामांतराची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक नवीन मागणी केली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच नाव बदलून संभाजीनगर करा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. भाजपाकडून नामकरणाच्या मुद्द्यावर जोर दिला जात आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध होत आहे. त्यामुळे शहराच्या नामकरणावरून विरोधकांकडून शिवसेनेला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र आहेत. या राजकीय वादात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुणे जिल्ह्याचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे. त्यामागील ऐतिहासिक घटनांचाही आंबेडकरांनी हवाला दिला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करा ही राजकीय मागणी आहे. तसा औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा फार संदर्भ सापडत नाही. संभाजी महाराज यांची समाधी पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याचं नाव बदलून संभाजी नगर करा अशी आमची मागणी आहे. संभाजी महाराज यांचा अंत्यविधी आणि दफन पुण्यात झालं मग पुण्याला त्यांचं नाव दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराची चर्चा महाराष्ट्रात गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे. दरवेळी औरंगाबाद महापालिका निवडणुकांपूर्वी हा मुद्दा चर्चेला येतो. खरंतर गेल्यावेळी भाजप- शिवसेनेचं सरकार राज्यात होतं तरीही या दोन शहराचं नामांतर होऊ शकलं नाही. औरंगाबाद महापालिका निवडणुका काही महिन्यावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगर हा सामना सुरु झाला आहे.