नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पूर्व लडाखमध्ये तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनकडून वास्तविक नियंत्रण रेषेजवळील (एलएसी) आपल्या कारवाया सुरूच आहेत. चीनने पश्चिम अरुणाचल प्रदेशमध्ये भारत, चीन आणि भूतानच्या सीमेजवळ तीन गावं वसवली आहेत.
लडाखमध्ये भारतीय सैन्याच्या खड्या पहाऱ्यामुळे आपली डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यानंतर आता चीनने अरूणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली आहे. चीन सध्या अरूणाचल प्रदेशच्या सीमेवर जोरदार हालचाली करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चीनने अरूणचालच्या सीमेवर तीन नवी गावे वसवली आहेत. भारतीय सॅटेलाईटसनी टिपलेल्या छायाचित्रांमध्ये ही बाब उघड झाली आहे. चीनने बुम ला दर्रा या परिसरापासून काही अंतरावर तीन गावे वसवली आहेत. या भागात भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमारेषा जातात. चीनने ही तिन्ही गावे आपली असल्याचा दावा केला आहे. तसेच या गावांमध्ये चीनकडून जाणीवपूर्व काही लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे आता भारताकडून यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चिनी सैन्य पँगाँग सरोवराच्या परिसरात एकमेकांसमोर उभे आहे. चिनी सैनिकांनी २९ आणि ३० ऑगस्ट रोजी पँगाँग सरोवराच्या भागात घुसखोरी केली होती. मात्र, भारतीय जवानांनी त्यांचा हा डाव उधळून लावत उलट चीनच्या ताब्यातील फिंगर २ आणि फिंगर ३ या टेकड्यांवर कब्जा मिळवला होता. तर ७ सप्टेंबरला चिनी सैनिकांना भारतीय सैनिकांना चिथावण्यासाठी हवेत गोळीबार केला होता.