नागपूर (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान हे १२ अंश सेल्सिअसवर घसरलं आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात विदर्भातील गारठा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळनंतर अनेक भागात गारठा वाढत असून पहाटे थंडीची तीव्रता अधिक प्रमाणात पाहायला मिळते. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात विदर्भातील तापमानात साडेतीन अंशाने घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशासह उत्तर भारतातील अनेक भागात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणाहून येणारे वारे हे विदर्भाच्या दिशेने येत आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच येत्या काही दिवसात हा पारा आणखी खाली घसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.सध्या विदर्भातील सर्व शहरांचे तापमान हे १२ अंशावर घसरलं आहे. विदर्भातील यवतमाळ शहराती सर्वाधिक कमी म्हणजे १२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर त्यापाठोपाठ चंद्रपूर १२.२ आणि नागपूर १२.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भातील थंडीचा कडाका बघता ठिकठिकाणी नागरिक स्वेटर्स, मफलर्स आणि शेकोट्यांचा आधार घेत आहेत.
















