छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) भरधाव दुचाकीवरून ट्रीपलसीट जाणाऱ्या तीन मित्रांना अज्ञात वाहनाने उडविले. ही धडक इतकी भीषण होती की, दोघं जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर आहे. दरम्यान, दोघंही मयत कंपनी कामगार होते.
सुंदरवाडीजवळ सोमवारी (दि. २४) पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अभिषेक राजू लोकल (२५, रा. कडा वसाहत, गारखेडा परिसर) आणि विजय जगन्नाथ काकडे (२५, रा. विष्णूनगर, जवाहर कॉलनी) अशी मृतांची नावे आहेत. तर, उमेश उमानंद कत्तीकर (२३, रा कडा वसाहत, गारखेडा परिसर) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अभिषेक आणि विजय हे कंपनी कामगार होते. तर, उमेश हा फोटो फ्रेम बनविण्याच्या दुकानात काम करतो. ते बालपणीचे मित्र होते. रविवारी अभिषेक आणि विजय दोघांनी दिवसभर कंपनीत काम केले. त्यानंतर उमेशला संपर्क करून सोबत जेवण्यासाठी जाण्याचे त्यांचे नियोजन ठरले. एकाच दुचाकीवरून ते झाल्टा परिसरात गेले. जेवण करून परतत असतांना तेथून परतत असताना मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात दुचाकीस्वार तिघेही गंभीर जखमी झाले. यात अभिषेक आणि विजय यांचा जागीच मृत्यू झाला.