जळगाव (प्रतिनिधी) मी शेतकऱ्याची मुलगी आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या दुर्दैवी वेळेत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. परंतु उलट शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांना अटक होत असल्याची खंत व्यक्त करीत चाळीसगावच्या नगरसेविका विजया पवार यांनी शिवसेना महिला आघाडी संघटकपदाचा राजीनामा दिला आहे.
श्रीमती पावर यांनी शिवसेनेच्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेला नाही. यामुळे सोशल मीडियावर त्या ट्रोलही होत आहेत. सौ. पवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे, की शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने वेळोवेळी आवाज उठवला आहे. आज तालुक्यातील शेतकरी अडचणीत असताना तब्बल सात हजार शेतकऱ्यांच्या वीज पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. याचा निषेध म्हणून तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावला जाऊन आंदोलन केले. यावेळी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात आंदोलन केले.
नगरसेविका सौ.विजया पवार यांनी राजीनामा पत्रात अनेक विषय नमूद करत आपली नाराजी व्यक्त केली आहे, आपल्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी उलट आमदार चव्हाणांसह शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला. त्यांना अटक केली. आमदारांची भूमिका योग्य असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे फोन आपल्याला आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आमदारांची ही कृती गुंडगिरीची असेल तर शेतकन्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कंपनीकडून त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार गुंडगिरीच आहे. मी देखील एक शेतकऱ्याची पत्नी, बहीण व मुलगी आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणार्या आमदारांना झालेल्या अटकेमुळे व्यथित झाले आहे.
त्या म्हणाल्या या संदर्भात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यात आपले सरकार असताना शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर मला शिवसेना महिला आघाडीच्या संघटक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार वाटत नाही. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांच्या भूमिकेला पाठिंबा म्हणून मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात सांगितले आहे.