नागपूर (वृत्तसंस्था) नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोलेंना टोला लगावला आहे. ज्यांना जे करायचं त्यांनी ते करावं. कुणीच कुणाला बांधून ठेवलं नाही. ही आघाडी आहे. ज्या पक्षाला जे करायचं त्यांनी ते करावं, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
सध्या महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या मागील काही दिवसांमधील वक्तव्यांमुळे व त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काहीशी धुसफूस सुरू असल्याचे दिसत आहे. माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ”काँग्रेसचा अजेंडा काय आहे हे तुम्ही त्यांनाच विचारा, केवळ एकच मी सांगतो की महाविकासआघाडीचे जनक शरद पवार आहेत. कोणी काही म्हणो शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघआडीचं सरकार काम करत आहे. मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहे त्यांच्या नेतृत्वात सरकार सुरू आहे. शरद पवार हे महाविकासआघाडीचे मार्गदर्शक आहे व ते या पुढेही राहतील. म्हणून बाकीची लोकं काय बोलतात, त्यावर आम्ही दररोज उत्तर द्यायचं, खुलासा करायचा हे मला काही योग्य वाटत नाही.”
तसेच, “मला तर हे बोलायचं आहे की, एच के पाटील हे काँग्रेसचे राज्याचे प्रभारी आहेत त्यांनी काय सांगितलं आहे, मल्लिकार्जुन खर्गे हे त्यांचे राज्यसभेतील नेते आहेत, ते मुंबईत येऊन गेले. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आहेत. आम्ही कुणाच्या बोलण्यावर जावं? अशाप्रकारच्या नेहमीच्या वक्तव्यांमुळे महाविकासआघाडीत फार फरक पडत असेल, असं मला वाटत नाही. आता तो एक मीडिया इव्हेंट नक्कीच झालेला आहे. ज्याला जे करायचं आहे त्यांनी ते करावं, आम्ही एखाद्या पक्षाला बांधून थोडीचं ठेवलं आहे, ही आघाडी आहे. याशिवाय ज्या पक्षाला जे काही करायचं आहे, त्यासाठी आम्ही का उत्तर द्यावीत.” असं पटेल म्हणाले.
एका व्यक्तीमुळे राजकारणाची दिशा ठरत नाही
राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी आधी शरद पवार आणि नंतर काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. प्रशांत किशोर कन्स्टंट आहेत. त्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात. ते कुणालाही भेटू शकतात. एका ठरावीक व्यक्तीमुळे राजकारणाची दिशा ठरत नसते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.