धरणगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर तीन कृषी विधेयके संसदेमध्ये पारित केले आहेत. या विधेयकांना देशभरातील शेतकर्यांमधून विरोध होत आहे. या विधेयकांच्या विरोधात आज धरणगावात कॉंग्रेसच्या वतीने डी.जी. पाटील यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येत आहे. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी भेट देऊन या विधेयकांच्या विरोधात स्वाक्षरी केली.
शेतकरी बिलाच्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले. ना. पाटील यांनी देखील या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवला. तसेच सही देखील केली. तर दुसरीकडे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी देखील कॉंग्रेसच्या स्वाक्षरी मोहीम स्थळी भेट देऊन सही करत आपले समर्थन दिले. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सचिव डी.जी.पाटील, तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र न्यायदे, ज्येष्ठ नेते सुरेश भागवत, तालुका उपाध्यक्ष तथा एरंडोलचे उपनराध्यक्ष योगेश महाजन, चंदन पाटील, सरचिटणीस विकास लांबोळे, गोपाल पाटील, युवक उपाध्यक्ष राहुल मराठे, नंदा महाजन, चंदू लांबोळे इत्यादी कार्यकर्ते व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.