धरणगाव (प्रतिनिधी) राम हे आपल्या सगळ्यांचे दैवत असून आपल्या जीवन जगण्याची एक ऊर्जा आहे. रामामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. कित्येक वर्षांचा संघर्ष आणि केलेल्या परिश्रमाला फळ म्हणून आज कारसेवकांचे योगदान व बलिदानातून प्रभू श्रीराम यांचे मंदिर प्रत्यक्षात साकारलेले आपण पाहत आहोत. त्यामुळे कारसेवकांचा सन्मान हा निश्चित कौतुकास्पद असून कारसेवकाना नतमस्तक होतो. पुढील कित्येक वर्षांपर्यंत ६ डिसेंबर १९९२ व २२ जानेवारी २०२४ हे दिवस एक सुवर्णक्षण म्हणून आपल्या कायम लक्षात राहणार असून रामराज्याचे पाईक होण्यासाठी जीवनात प्रभू रामाचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. देशाचे पंतप्रधान यांच्यामुळे आज देश एकसंघ असून एकजूट पहायला मिळाली आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री तथा शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते बालाजी वहन व्यवस्थापक मंडळामार्फत “ सन्मान कारसेवकांचा ” या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे समरस्त संघाचे उपाध्यक्ष आर.एन.महाजन सर हे होते.
६४ कारसेवकांचा झाला सन्मान
धरणगाव तालुक्यातील ६४ कारसेवकांचा संम्मान सोहळा येथील बालाजी व्यवस्थापक मंडळामार्फत आयोजित करण्यात आला होता. सर्व ६४ कारसेवकांचा सत्कार राम मंदिर ते राष्ट्र मंदिराची प्रतिकृती असलेली प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.डी. महाजन सर यांनी केले. प्रास्ताविकात बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष आर.डी. पाटील यांनी “सन्मान कारसेवकांचा” कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती विषद केली. आभार सचिव प्रशांत वाणी यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कार सेवेत भाग घेणाऱ्या दिवंगत कारसेवकांना नमन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संघाचे जेष्ठ पदाधिकारी धृवसिंग राजपूत यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रभू श्रीराम देशाची अस्मिता – आर.एन.महाजन
कार सेवा आंदोलनातील मी एक प्रत्यक्ष साक्षीदार आहे असे सांगून आयोध्येत झालेल्या रक्तरंजित घटनेचा त्यांनी आखों देखा हाल कथन केला. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबईत हिंदू सुरक्षित असल्याचे सांगून त्यांचा मलासार्थ अभिमान असल्याचे सांगून प्रभू श्रीराम हे आपल्या देशाची अस्मिता आहे. श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनासाठी झालेल्या प्रदीर्घ आंदोलनात प्राणाची पर्वा न करता कारसेवकांनी प्रखर लढा दिला. त्यांचे योगदान, बलिदान व त्याग अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन राज्याचे समरस्त संघाचे उपाध्यक्ष आर. एन महाजन सर यांनी केले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. डी.आर. पाटील यांनी “ सन्मान कारसेवकांचा ” बाबत माहिती विषद केली. सूत्रसंचालन आर.डी. महाजन सर यांनी केले तर आभार सचिव प्रशांत वाणी यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष आर.डी. पाटील, उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे सह सचिव गुलाबराव वाघ, सचिव प्रशांत वाणी , संचालक आर.एन महाजन सर, कार्याध्यक्ष जिवनसिंग बयास, भानुदास विसावे, पप्पू भावे, विलास महाजन, यांच्यासह शहरवासीय व परिसरातील पदाधिकारी , श्रीरामभक्त व कारसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.